मुंबई, 29 डिसेंबर (हिं.स.) – सहा लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, असे म्हणत नेपाळमधील काठमांडू येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील ५८ जणांना डांबून ठेवले होते. या पर्यटकांनी अनेक नेत्यांना फोन, मेसेज केले, मात्र प्रतिसाद काही मिळाला नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त एक मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलवली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक आपल्या घरी पोहोचले. काठमांडूमध्ये अडकलो तेव्हा देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले, अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली.
भाविकाने सांगितली आपबिती
नेपाळमध्ये अडकलेला एक भाविक संजू म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही कामोठे गावातील (ता. पनवेल, जि. रायगड) ५८ भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेलो होतो. यात ३५ महिला आणि २४ पुरुषांचा समावेळ होता. गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले. मात्र, काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आले. भाविकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, त्यांची फसवणूक झाली होती. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये द्या, नाही तर सोडणार नाही, असे सांगत या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धमकावायला सुरुवात केली. परक्या गावात अचानक समोर आलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला. त्यांनी ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून सर्व प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खाजगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.
देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना कळविले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचवले. दरम्यान फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. त्याप्रमाणे रेल्वेने भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण सुखरुपपणे मुंबईला पोहोचल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
