सैन्याने भरती परीक्षेच्या पद्धतीत केला बदल
नवी दिल्ली, 22 जानेवारी (हिं.स.) : भारतीय सैन्यासाठी अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुषंगाने भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहे. अग्निवीर उमेददारांना आता आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. सैन्यात भरती होणा-या उमेदवारांना या वर्षीपासून ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.
अग्निवीर भरतीसाठी मानसिक तपासणी चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये सैनिकांची 3 बाबींवर तपासणी केली जनर आहे. पहिली तपासणी म्हणजे, उमेदवारमध्ये स्वतःचे नुकसान करण्याची कोणतीही प्रवृत्ती नाही. दुसरे म्हणजे, तो इतरांना इजा करणार नाही आणि तिसरे म्हणजे, त्याच्याकडे सामाजिकदृष्ट्या नकारात्मक दृष्टिकोण नाही. या तीन बाबींची पूर्तता केल्यानंतरच त्याला लष्करात भरती होण्याची संधी मिळणार आहे. ही नवी परीक्षा अग्निवीर भरती दरम्यान द्यावी लागणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या लष्कर भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य राहणार आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. जिथे थेट भरती असेल तिथे देखील या उमेदवारांना या परीक्षेला बसावे लागणार आहे. वाढत्या आत्महत्या किंवा लष्करातील सहकाऱ्यांवरील हल्ले आणि अनेक सैनिक समाजविघातक कृत्यांमध्ये गुंतलेले असल्याने ही परीक्षा अनिवार्य करण्यात आल्याची माहिती आहे.
याबाबत सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिक आरोग्य तपासणी चाचणी अग्निवीर भरतीमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षी अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान ही परीक्षा सुरू करण्यात आली होती. आता सर्व केंद्रांवर अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान, ही परीक्षा घेतली जाणार असून त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. चालू वर्षात (2024-25) या नव्या परीक्षेची पूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे. लष्कर भरतीसह मिलिटरी पोलिस भरतीसाठी देखील ही परीक्षा अनिवार्य करण्यात येणार आहे. सैन्याने मानसिक चाचणीसाठी एक मॉड्यूल तयार केले आहे. ज्यामध्ये वर नमूद केलेल्या तीन पॅरामीटर्सवर सैनिकांच्या मानसिकतेची चाचणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यानच ही परीक्षा पूर्ण होईल. लष्कराच्या सूत्रांनुसार, दरवर्षी 100 ते 140 सैनिक आत्महत्या करतात. तिन्ही दलाची संख्या बघता हा आकडा मोठा आहे.
संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2017-2022 या काळात तिन्ही सैन्य दलात सुमारे 800 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. तर यात अपघाती गोळीबारामुळे मृत्यूची काही प्रकरणे असू शकतात. याशिवाय रजा न मिळाल्याने किंवा इतर कारणांमुळे सैनिकांनी आपल्या सहकाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सैन्यातर्फे सैनिकांमधील वाढत्या तणाव कमी करण्यासाठी एक उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. यात अग्निवीरसह सर्व श्रेणींच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
