नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : भारत आणि श्रीलंका यांच्या नौदल आणि तटरक्षक दलांच्या प्रतिनिधींमध्ये, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा (आयएमबीएल) संदर्भातली 33 वी वार्षिक बैठक झाली. ही बैठक भारत- श्रीलंका सागरी सीमारेषेवर पाल्क सामुद्र धुनीच्या पॉईंट कॅलिमर येथे शुक्रवारी आयएनएस सुमित्रा या जहाजावर पार पडली. दोन्ही देशांमधील समपदस्थांमधील संवाद हा दोन्ही देशांची नौदले आणि तट रक्षक दले यांमधले संबंध आणि समन्वय दृढ करण्यासाठीचा मंच काम करतो.
तटरक्षक दल क्षेत्रीय मुख्यालय (पूर्व) यांचे प्रतिनिधी, भारताच्या कोलंबो मधील राजदूतांचे संरक्षण सल्लागार आणि दोन्ही देशांमधील अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होते.
पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात या प्रदेशांमधील सागरी संरक्षण तसेच मच्छिमारांची सुरक्षा आणि मालाच्या तस्करीला आळा घालणे अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर या बैठकीदरम्यान नौदल आणि तटरक्षक दल यांच्यामध्ये चर्चा झाली.
दोन्ही देशांचे नौदल आणि तटरक्षक दल यांच्यामधील विद्यमान संवादाचे जाळे अजून विस्तृत करणे , योग्य प्रकारे माहितीची देवाणघेवाण करणे यासाठीचे मार्ग आणि साधने विकसित करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली.
कोणत्याही कारवाईसाठी परस्परामधील सहकार्य महत्त्वाचे आहे यावर दोन्ही बाजूचे एकमत झाले आणि या भागातील सागरी संरक्षण मजबूत करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांवर पुढील कार्यवाही करण्यावर सहमती झाली.
