सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)अयुब हुसेन सय्यद (रा. उत्तर सदर बझार, मुर्गी नाला, सोलापूर) या तृतीयपंथीचा खून करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील तिघांना अवघ्या सहा तासांत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. सदर बझार पोलिसांचीही मोठी मदत त्यांना झाली. तिन्ही संशयितांना न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. तिघांनी तृतीयपंथीकडे असलेल्या तब्बल ४० किलो सोन्याच्या दागिन्यांसाठी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मयत अयुब हुसेन सय्यद हे तृतीयपंथी राहायला होते. नगरसेवकाची निवडणूक लढण्यास ते इच्छुक होते. इन्स्टाग्रामवर देखील त्यांचे रिल्स होते. त्यावरून अफताब इसाक शेख (वय २४, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर, लातूर) आणि मृत अयुब यांच्यात ओळख झाली. त्यानंतर अफताब हा सोलापुरात येऊन अयुबला अनेकदा भेटला. अयुब एकटाच राहातो, रात्री तो मद्यपान करतो याचीही माहिती अफताबला होती. त्याच्याकडील दागिने चोरल्यावर कोट्यवधी रुपये मिळतील म्हणून अफताबने शनिवारी ओळखीतील यशराज उत्तम कांबळे (वय २१, रा. इंदिरा नगर, लातूर) याला प्लॅन सांगितला. यशराजने त्याच्या ओळखीतील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या वैभव गुरुनाथ पनगुले (रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर, लातूर) याला सोबत घेतले. तिघेजण दुचाकीवरून सोलापुरात आले. मध्यरात्री ते अयुबचा खून करून दागिने घेऊन पसार झाले.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
