अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.) : वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करून चटई, आणि झुंबर विक्री करणाऱ्या एका भटक्या टोळीने ठिय्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याबाबत नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार दिवस उलटूनही त्या मुलीचा शोध लागला नाही.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिनापूर्वी बाळापुरे ले आउट मधील रिकाम्या जागेवर आशिष दीपक राऊत या विवाहित व्यक्तीने आपल्या कुटुंबासह तंबू ठोकून तेथून चटई आणि झुंबर विक्रीचे काम करत होता. आशिष यांचे संपूर्ण कुटुंब या व्यवसायात होते. महिला वर्ग चटई आणि झुंबर तयार करायचे आणि आशिष आणि त्याचा भाऊ दोघे वाहनाने नांदगाव पेठ तसेच आजूबाजूच्या परिसरात जाऊन चटई आणि झुंबर विक्रीचे काम करायचे. आशिषने ज्या ठिकाणी तंबू ठोकला होता त्या बाजूला असलेल्या घराशी त्याने ओळख निर्माण केली होती.सोमवारी सकाळी घरातील सदस्य झोपेतून उठल्यावर त्यांना घरात मुलगी दिसली नाही त्यामुळे त्यांनी शेजारी व नातेवाईक यांच्याकडे विचारणा केली मात्र कुठेच आढळून न आल्याने त्यांनी घराजवळ असलेल्या तंबू कडे जाऊन बघितले तर तेथून तंबू आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोकांनी पलायन केल्याचे दिसून आले.कुटुंबियांना शंका येताच त्यांनी तातडीने नांदगाव पेठ पोलिसांत जाऊन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. अद्याप पोलिसांना त्या मुलीच्या शोध लागला नाही मात्र पोलीस याप्रकरणी तपास करीत असल्याचे पो.नि. प्रवीण काळे यांनी सांगितले.
भटक्या लोकांवर अंकुश हवा
नांदगाव पेठ मध्ये विविध व्यवसायाच्या निमित्ताने अनेक भटके लोक कुटुंबासह येतात आणि मिळेल त्या ठिकाणी आपला तंबू ठोकून वास्तव्य करतात. आजच्या या घटनेने या भटक्या लोकांवरील विश्वास कमी झाला असला तरी या लोकांची माहिती पोलिसांकडे असायला हवी शिवाय यांच्यावर पोलिसांचा अंकुश असावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
हिंदुस्थान समाचार
