कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढून टाकण्यात यावे असे विधान केले आहे. सावरकरांविषयी स्वतःचे मत मांडताना ते म्हणाले, सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी कोणी दिली? त्यांचे असे काय कर्तृत्व आहे? ब्रिटिशांची पेन्शन घेणारे आणि त्यांना शरण जाणारे सावरकर आहेत. अशा माणसाचे छायाचित्र विधानसभेतून काढून टाकले पाहिजे.
सावरकरांवर अशा प्रकारचे आक्षेप वारंवार घेतले जातात. अनेक वेळा या आक्षेपांचे आरोपांचे सब प्रमाण खंडन करण्यात आले आहे. तरीसुद्धा सावरकरांवर आगपाखड वारंवार केली जाते. या मागची मानसिकता विकृत आहे हे सांगण्यासाठी कोणा तज्ञ माणसाची आवश्यकता नाही.
प्रियांक खरगे आज स्वतंत्र हिंदुस्थानातील कर्नाटक राज्याचे मंत्रीपद सांभाळत आहेत ते सावरकरांनी केलेल्या त्यागाचे फळ आहे. ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येत नाही. सावरकरांनी राष्ट्रासाठी काय केले हा प्रश्न जेव्हा त्यांच्या मुखातून येतो त्यावेळी त्यांना स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास ठाऊक नाही हेच सिद्ध होते.
सावरकरांनी या हिंदुस्थानचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर होण्यापासून रक्षण केले आहे. सावरकर नसते तर आज या देशात इस्लामिक सत्ता सहजतेने प्रस्थापित करणे काँग्रेसला शक्य झाले असते. मुळातच देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले ते सावरकरांच्या युद्धनीतीमुळे. गांधींच्या अहिंसेमुळे हिंदुस्थानला स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही. हे सत्य सांगण्यासाठी काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला नाही. दुसऱ्याच्या कष्टावर म्हणजेच सावरकरांच्या कष्टावर काँग्रेसने स्वतःच्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे.
देश स्वतंत्र झाल्यावर होणाऱ्या निवडणुकीत आपला पराभव होणार याची खात्री काँग्रेसला होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण देशात राष्ट्रीय भावना जागृत केली होती. गांधींनी स्वातंत्र्यांपेक्षा हिंदू-मुस्लिम ऐक्याला प्राधान्य दिले. परिणामी मुसलमानांची दादागिरी या देशात वाढत चालली होती. सावरकरांमुळे या गोष्टीला पायबंद घातला गेला. ब्रिटिशांच्या सैन्यात असलेले मुसलमानांचे संख्याबळ कमी करून हिंदूंचे संख्याबळ वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम सावरकरांनी केले.
हातात शस्त्र घेऊन हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदूंचे राज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या ब्रिटिशांसमोर नि:शस्त्र लढा देऊन स्वातंत्र्य निर्माण करता येणार नाही हे सावरकर जाणत होते. आपल्या देशाची परंपरा एक क्षात्रतेजाने भरलेली आहे. ही शौर्याची परंपरा हा शौर्याचा वारसा अबाधित ठेवण्यासाठी सावरकरांनी सशस्त्र क्रांतीने परकीय राजसत्तेपासून राष्ट्राची मुक्तता करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याचा यज्ञकुंड धगधगता ठेवला. तो असा…..
सावरकरांनी केवळ हिंदुस्थानातल्या हिंदी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामागे जसे देश स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे मूलभूत कारण होते तवढेच महत्त्वाचे आणखी एक कारण होते. ते कारण म्हणजे पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांच्या सैन्यात हिंदी तरुणांची संख्या अत्यंत कमी होती. त्यांची संख्या सैन्यात अधिक असणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या संरक्षणाचे दायित्व राष्ट्रनिष्ठ असलेल्या सैनिकांच्या खांद्यावर देणे क्रमप्राप्त होते. सावरकरांच्या या सैन्य भरतीच्या प्रेरणेमागे हा ही प्रधान हेतू होता. सावरकरांच्या या प्रयत्नाला यश आले आणि ब्रिटिश सैन्यातील हिंदी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
सावरकरांना आणखीन एक गोष्ट साध्य करायची होती. त्यासाठी सावरकर आणि सुभाषबाबू यांची अचानक झालेली भेट ही सावरकरांचा मनोदय पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरली.
दिनांक २२ जून १९४० या दिवशी त्यावेळचे देशगौरव आणि नंतरचे नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांना भेटण्यासाठी अचानकपणे सावरकर सदनात आले.
ते सावरकरांना म्हणाले, मी जीनांना आत्ताच भेटून आलो पण त्यांनी मला विचारले, मिस्टर सुभाषबाबू तुम्ही कोणाच्या वतीने तडजोडीची बोलणी करण्यास आला आहात?
सुभाष बाबू जीनांना म्हणाले,काँग्रेसच्या वतीने.
जीना म्हणाले, पण तुम्हाला तर काँग्रेसने बहिष्कारले आहे.
सुभाषबाबू, पण फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचा मी अधिकृत पुढारी आहे की नाही! त्याच्या वतीने मी बोलू शकतो.
जीना म्हणाले, परंतु जर तुम्ही मला मुसलमानांचा पुढारी म्हणून हिंदू मुसलमानांच्या तडजोडी करता भेटत असाल तर हिंदूंच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार असलेल्या कोणाशी तरी बोलण्यात अर्थ आहे. तुमचा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्वतःला हिंदू संस्था म्हणवून घेतो आहे का?
जीनांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना सुभाषबाबू म्हणाले, मी एक हिंदू म्हणून तरी हिंदू मुसलमान तडजोडी विषयी बोलू इच्छितो.
जीना म्हणाले, तुम्ही प्रथम सावरकरांना जाऊन भेटा. हिंदूंचे प्रतिनिधित्व तेच करू शकतात. व्यक्तीने व्यक्तीशी चर्चा करण्यात काही उपयोग नाही. सावरकर आले तर आपण काही चर्चा करू.
जीनांच्या या उत्तरामुळे सुभाषबाबू सावरकरांना भेटायला सावरकर सदनात गेले.
सुभाषबाबूंचे सावरकरांना भेटण्यासाठी येण्यामागचे कारण सावरकरांना कळले. सावरकरांनी त्यांना मुख्य मुद्द्याकडे वळण्यासाठी विचारले, हे सर्व सोडून द्या. यावर चर्चा करण्यापेक्षा आपण अधिक महत्त्वाच्या मुद्यावर संवाद साधणे महत्त्वाचे आहे. सध्या महायुद्धाच्या संकटात ब्रिटन सापडले आहे. आपल्यासारखा पुढारी हिंदुस्थानात राहून हालवेलचा पुतळा कलकत्त्याच्या मार्गातून उखडून टाकण्यासाठी चळवळीत गुंतला आहे. अशा अत्यंत क्षुल्लक चळवळीमुळे ब्रिटिशांच्या कारागृहात जाऊन सडत पडण्यात काहीही अर्थ नाही.
सुभाषबाबू, सावरकर, जनतेत काहीही करून ब्रिटिशांच्या विरोधात संताप निर्माण केला पाहिजे. तेच काम मी करत नाही का?
सावरकरांनी त्यांच्या प्रामाणिक राष्ट्रकार्याचे आणि तळमळीचे कौतुक केले. मग त्यांनी जपानमध्ये वास्तव्य करत असलेल्या रासबिहारी बोस यांच्याशी त्यांचा चालू असलेल्या पत्रव्यवहाराबद्दल सविस्तर सांगून सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले, आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यातील काही सैनिक जर्मनीच्या हाती सापडले आहेत. त्या सैनिकातून क्रांतिसैन्य उभे करण्यात आले आहे. जर्मनी आणि जपानच्या अद्ययावत शस्त्रानिशी आणि लढाईत मुरलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांची हिंदुस्थानवर बाहेरून स्वारी करण्याची कधीही न आलेली सुवर्णसंधी आपण आता साधू शकतो. अशावेळी तुमच्यासारख्या पुढाऱ्याने हिंदुस्थानात राहणे उचित नाही. रासबिहारींसारखे अनेक सशस्त्र क्रांतिकारक पुढारी ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जपान आणि जर्मनीमध्ये निसटून गेले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ब्रिटिश सरकारच्या हातावर तुरी देऊन या देशातून बाहेर पडा. तिकडे जर्मनी, इटली यांच्या हाती सापडलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांचे नेतृत्व तुम्ही करावे. असा सशस्त्र आणि साहसी पराक्रम करण्यासाठी जी दोन माणसे मला समर्थ वाटतात त्यापैकी तुम्ही एक आहात.
सावरकरांचे सर्व बोलणे ऐकून झाल्यावर सुभाषबाबू सावरकरांना म्हणाले, मी प्रथम कलकत्त्याला जातो आणि तिथे काय घडते ते पाहतो. त्यानंतर माझा पुढचा नक्की कार्यक्रम कोणता ते ठरविन. इकडे आल्यास पुन्हा आपल्याला भेटेन.
एवढी चर्चा झाल्यावर सुभाषबाबू सावरकरांचा निरोप घेऊन निघून गेले.
सुभाष बाबू कलकत्त्याला गेल्यावर ते कलकत्त्यामधला हालवेलचा पुतळा उखडून टाकण्याच्या कामात व्यस्त झाले. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून कारागृहात टाकले. त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या हातावर तुरी देऊन ते परराष्ट्रात म्हणजे जर्मनीला निघून गेले. सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे हिंदू सैनिक इटली आणि जर्मनीच्या हाती सापडले. त्या सहस्रावादी ब्रिटिश हिंदी सैनिकांना जर्मनीच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सज्ज करून भारतीय क्रांतिसेना उभारली. या क्रांतिसेनेच्या सैनिकांना ते ब्रिटिश सैन्यात असल्यामुळे ब्रिटिशांची युद्धनीती पूर्णपणे अवगत झाली होती. ही गोष्ट दृष्टी आड करून चालणार नाही. त्यांच्या या अनुभवाचा लाभ ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठीच पुढे उपयुक्त ठरला.
सुभाषबाबू जर्मनीतून पाणबुडीने ते जपानने जिंकलेल्या सिंगापूरला गेले. सिंगापूरहून ब्रिटिश सेनानी पळून गेल्यामुळे तिथे उरलेल्या उरलेल्या शस्त्रास्त्रांच्या अपार साठ्याने तेथील ४०-५० सहस्र हिंदी सैन्याने जपानच्या पाठिंबामुळे रासबिहरी बोसांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी क्रांतिसैन्य उभारले. सुभाषबाबू तिथे पोहोचल्यावर त्याच सैन्याचे सरसेनापती पद त्यानी स्वीकारले. त्याच शस्त्र बळाच्या जोरावर सुभाषबांबूंनी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याची जागतिक घोषणा केली. हिंदुस्तानचे अस्थायी राज्यशासन स्थापन केले. सिंगापूरहून चलो दिल्लीची रणगर्जना करीत ती क्रांतिसेना ब्रह्मदेश ओलांडून थेट आसामच्या दाराशी येऊन धडकली. ब्रिटिश संन्याशी रणक्षेत्रात आपले सैन्य कसे लढले याबाबतचा सर्व इतिहास सर्वांनाच माहित आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावरकरांनी चालू केलेली सैनिकीकरणाची चळवळ कशी लाभदायक ठरली याकडे मला सर्वांचे लक्ष वेधायचे आहे. सावरकरांच्या सैनिकीकरणामुळे स्वतंत्र सेनेला सैनिक मिळाले. हे सावरकरांच्या राजनीतीचे वैशिष्ट्यपूर्ण यश होते. हिंदुस्तानच्या ब्रिटिश सैन्यात सहस्रावधी हिंदू सैनिकांची भरती करण्यासाठी सावरकरांनी जे सैनिकीकरणाचे आंदोलन केले त्यामुळे ही गोष्ट शक्य झाली. हे आपल्याला विसरून चालणार नाही.
याच बाबत सिंगापूर मधील आझाद हिंद आकाशवाणी वरून २५ जून १९४४ या दिवशी प्रक्षेपित झालेल्या सरसेनापती सुभाषबाबू त्यांच्या भाषणात म्हणाले,
काँग्रेस मधील बहुतेक अदुरदर्शी पुढारी ब्रिटिश हिंदी सैन्याला केवळ भाडोत्री आणि पोटभरू म्हणून सारखे हिणवत राहिले. तरीही उत्साहदायी गोष्ट ही आहे की वीर सावरकर निर्भयपणे हिंदी तरुणांना सशस्त्र सैन्यात भरती व्हा म्हणून सारखे उत्तेजित करत आहेत. ब्रिटिश हिंदी सैन्यात असलेल्या याच हिंदी तरुणांनी आज आमच्या हिंदी राष्ट्रीय सैन्याला युद्ध केलेत प्रवीण आणि मुरलेल्या प्रतिपक्षांचा आणि सैनिकांचा पुरवठा होत आहे.
वर्ष १९५४ च्या ऑगस्ट महिन्यात जे.सी.ओहसावा या जपान मधल्या सुप्रसिद्ध ग्रंथकाराचे THE TWO GREAT INDIANS हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात रासबिहारी बोसांच्या चारित्र्याविषयी आणि खास करून जपान मधील वास्तव्याविषयी त्यांनी केलेल्या क्रांतिकारक कार्याचा अभूतपूर्व वृत्तांत दिला आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्य सिगापूरवर चालून गेले. त्यावेळी तेथील ब्रिटिश हिंदी सैन्याशी जपानची लढाई झाली तेव्हा सेनापती रासबिहारी बोसांच्या क्रांतिकारक सैन्याची तुकडी ब्रिटिशांशी लढत होती. या ग्रंथकारांनी या प्रसंगासंबंधीच्या दैनंदिन्यातील एक उतारा इथे सांगणे संयुक्तिक ठरेल.
फेब्रुवारी महिन्यात जपानने सिंगापूरवर आक्रमण केले. ब्रिटिश सैन्यातील हिंदी सैनिकांचा अडथळा जबरदस्त होता. जपान मधल्या सैन्याला अनेक अडथळे दूर करण्यासाठी भयंकर संघर्ष करावा लागला.
हिंदुस्तानच्या राष्ट्रीय सेनेचे प्रमुख आघाडीवर होते. ब्रिटिश सैनिकांना हिंदुस्थानातल्या हिंदी सैनिकांबद्दल कोणत्याही प्रकारे आपुलकीची भावना नव्हती. त्याचबरोबर त्यांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याविषयी आत्मीयता नव्हती. ही गोष्ट हिंदी सैनिकांना विशेषत्वाने जाणवली. त्याच क्षणी हिंदी सैनिकांनी सावरकरांनी सांगितलेला मंत्र तात्काळ उपयोगात आणला. त्यांनी आपल्या हातातील शस्त्र ब्रिटिश सैनिकांवर चालवली. अशाप्रकारे सावरकरांच्या सैनिकीकरणाची चळवळ दुसऱ्या महायुद्धात आकाराला आली.
ब्रिटिश सैन्यात सहभागी झालेले हिंदी सैनिक आणि क्रांतिसेनेतील सैनिक यांनी एकत्रितपणे जेव्हा विजयाच्या घोषणा दिल्या त्यावेळी जपानी सैनिकांची मती गुंग झाली.
अशा प्रकारे जपानी सैन्याने सिंगापूर ताब्यात घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
क्रांतिकारकांना असे यश मिळत असतानाच हिंदुस्थानात स्वतःला नि:शस्त्रवादी आणि अहिंसक म्हणावणाऱ्या काँग्रेसने नि:शस्त्र प्रतिकाराचा आपला मार्ग तसाच चालू ठेवला. आणि ही मंडळी ब्रिटिशांना सांगत होती, ब्रिटिशांनो, हिंदुस्तान सोडा,पण तुमचे सैन्य मात्र हिंदुस्थानात ठेवा.
सावरकरांची रणनीती यशस्वी झाली होती. म्हणूनच ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानातील आपला गाशा गुंडाळण्याचे ठरवले. Independence of Indian act च्यावेळी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये साम्राज्य सत्ता सोडण्याचा प्रसंग आल्यामुळे दुःखी कष्टी झालेल्या चर्चिलच्या अनेक प्रश्नांना निरुपायाने उत्तर द्यावे लागले. ब्रिटिश पंतप्रधान ॲटलींनी आपल्या सरकारच्या मनाच्या सत्यस्वरुपाचे मोजक्या वाक्यात करताना म्हटले,
ब्रिटनला सत्तांतर करावे लागत आहे कारण भारतीय सैन्य ब्रिटिश सरकारशी प्रामाणिक राहिले नाही.
भारतावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सैन्य ब्रिटिश सरकार भारतात ठेवू शकत नाही.
यातून हेच स्पष्ट होते की सैनिकी दुर्बलतेच्या कारणामुळे ब्रिटिशांना हिंदुस्थानातून काढता पाय घ्यावा लागला.
अहिंसेचे तत्त्वज्ञान आम्हाला पटल्यामुळे आमचे हृदय परिवर्तन झाले किंवा साम्राज्यवाद हा अन्यायकारक आहे ही गोष्ट आम्ही स्वच्छने स्वीकारली त्यामुळे आम्ही हिंदुस्तान सोडून जात आहोत असे ब्रिटनचे पंतप्रधान अटली म्हणाले नाहीत किंवा ब्रिटिशांच्या संसदेतला कोणताही सभासद असे म्हणाला नाही. ही गोष्ट आपण दुर्लक्षित करून चालत नाही. त्यामुळे सावरकरांच्या सैनिकीकरणा मागची राजनीती सावरकरांच्या विरोधकांना एक तर कळली नसावी किंवा स्वतःची हार त्यांना मान्य नसावी म्हणूनच त्यांनी सावरकरांच्या सैनिकीकरणाला विरोध करून रिक्रुटवीर म्हणून सावरकरांची हेटाळणी केली.
सावरकरांनी दिलेल्या या लढ्यामुळेच आणि त्यांच्या राजनीती मुळेच प्रियांक खरगे आज कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री म्हणून गावभर हिंडत आहेत. सावरकरांच्या या कार्याकडे पाठ फिरवून सावरकरांनी देशासाठी काय केले? असा प्रश्न विचारून त्यांचे तैलचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढून टाकण्याचा उद्धटपणा प्रियांक खरगे यांनी केला आहे. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास ज्याला माहित नाही अशा माणसाला कोणतेही राजकीय पद उपभोगण्याचा नैतिक अधिकार नाही. सावरकरांसारख्या देशभक्ताला अवमानित करण्याचा अक्षम्य अपराध प्रियांक खर्गे यांनी केला आहे. हा अपराध देशद्रोही अपराधाएवढाच भयंकर आहे. जनतेने त्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देऊन राजसंन्यास घेण्यास भाग पाडावे आणि कायमचे घरी बसवावे.
– दुर्गेश जयवंत परुळकर
व्याख्याते आणि लेखक
९८३३१०६८१२
हिंदुस्थान समाचार
