स्वातंत्र्यपूर्व काळात देशातल्या तरुणांसमोर स्वातंत्र्यप्राप्ती हे ध्येय होते. देशाचे स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर स्वत्व आणि आपल्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान जनतेने जतन करावा असा कोणताही प्रयत्न सरकारी पातळीवर करण्यात आला नाही. राजकीय दृष्ट्या देश स्वतंत्र झाला पण मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून तो मुक्त झाला नाही. आपण आपली शिक्षण पद्धती आपल्या समाजहिताला, राष्ट्रहिताला अनुकूल ठरणारी तसेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा जाज्वल्य अभिमान निर्माण करणारी अस्तित्वात आणू शकलो नाही. घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा आणि स्वातंत्र्याचा नेमका अर्थ आपल्याला उमगला नाही. किंबहुना देशातील डाव्या विसरणीच्या लोकांनी स्वतःचा बौद्धिक दहशतवाद निर्माण केला. या सर्व गोष्टींना हेतुत: नेहरूंनी खत पाणी घातले. परकीय आक्रमकांनी विकृत केलेला इतिहास बदलण्याचा सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात आला नाही. हिंदू सोडून अन्य धर्मीयांना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची अनुमती देण्यात आली. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती नष्ट मग करण्यामागचा हा कुटील डाव टाकण्यात आला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अमर्यादित उपयोग करून देशातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. अत्यंत कष्टाने देशाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याऐवजी त्या स्वातंत्र्याचा आणि सर्वभौममत्वाचा गळा घोटण्यासाठी सत्ताधिशांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला. सुसंस्कृत आणि सुविद्य विचारसरणी देशात रुजवण्याऐवजी विकृत विचारसरणीला खत पाणी घातले. त्यामुळे देशात फुटिरता आणि विद्वेषाचे तण अमाप वाढले.
आज खऱ्या अर्थाने देश कात टाकून अभिमानाने जगात वावरत असताना डाव्यांची अविचारी चळवळ आजही अपशकुन करत आहे. काँग्रेसच्या राजवटीत देश स्वावलंबी व्हावा, लष्करी दृष्ट्या प्रबळ व्हावा आणि सर्व क्षेत्रात आघाडीवर राहिला पाहिजे म्हणून प्रयत्न करण्यात आले नाहीत. सर्वात मोठी लोकशाही असलेला बलहीन, स्वाभिमान शून्य देश म्हणून हिंदुस्थानकडे जग पाहत होते. आज जगात आपल्या देशाची प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. ही समाधानाची आणि आनंदाची बाब आहे.
विद्यमान भारत सरकारने एका दशकाच्या अवधित हिंदुस्थानचा कायापालट केला आहे. आत्मनिर्भर, सबल आणि निर्भीड हिंदुस्तान अशी हिंदुस्तानची प्रतिमा आज जगासमोर आहे.
आज पर्यंत हिंदू समाजावर झालेला अन्याय दूर करून न्याय प्रस्थापित करणे हे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. न्याय प्रस्थापित करताना देशातील फुटीरतावादी वृत्तीच्या उपद्रवाला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. देशात अशांतता अराजकता निर्माण व्हावी म्हणून ही दुष्ट प्रवृत्ती कमालीची सक्रिय होऊ शकते. ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही.
आज उपलब्ध असलेल्या समाज माध्यमांचा उपयोग करून सर्वसामान्य जनतेचा आणि तरुण वर्गाचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर चालू आहे. त्याला वेसण घालण्याचे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.
उगवत्या पिढीला स्वातंत्र्याचा नेमका अर्थ समजावून सांगण्याचे दायित्व आपल्यावर आहे. देशाचे स्वातंत्र्य म्हणजे देशाच्या उत्कर्षासाठी, रक्षणासाठी, संघटित समाज निर्माण करण्यासाठी, देशात सलोखा निर्माण करण्यासाठी, देशातील सर्व नागरिक समान आहेत, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही, अशा प्रकारच्या आचारविचारांना चैतन्य प्रदान करणे होय.
स्वातंत्र्याचा अर्थ देशातल्या नागरिकांमध्ये राष्ट्रीय कार्य करण्यासाठी चैतन्य निर्माण करणे असा आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य ही नैतिक संपदा आहे याची जाणीव पिढ्यानपिढ्या प्रत्येक नागरिकात सजग असली पाहिजे यासाठी आपल्याला पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागतील. त्याची सिद्धता करण्याची हीच योग्य वेळ आहे.
आज शौर्याला क्रौर्य ठरवून क्रौर्याचे गुणगान गायले जाते. त्याचा समाचार घेऊन शौर्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मानवता महत्त्वाची आहे बाकी सर्व गोष्टी गौण आहेत असा एककल्ली विचार समाजात आजही फोफावत चालला आहे. तो वेळीच नष्ट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.
मानवता केवळ हिंदूंनीच दाखवावी आणि इतरांनी
अमानवीय कृत्ये उजळ माथ्याने करावित असा मानवतेचा विपरीत अर्थ लावला जात आहे त्याचा बिमोड करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. मानवतेच्या नावाखाली राष्ट्राच्या हिताचा बळी देण्याचा प्रयत्न कठोरतेने मोडून काढावा लागेल. तसेच हिंदू समाजाला त्याच्या संस्कृती आणि धर्मासह समूळ नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर जे षडयंत्र रचले जात आहे त्याचा उच्छेद करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.
जगातल्या कोणत्याही धर्माशी पंथाशी हिंदूंचे वैर नाही. हिंदू कोणाचाही द्वेष करत नाही. सर्व जग सुविद्य आणि सुसंस्कृत व्हावे हीच हिंदू समाजाची विचारसरणी आहे. या सर्वोच्च संस्काराला अनुसरून हिंदू वर्तन करतील. त्याचवेळी जगातील इतरांनी अमानवीय कृत्य करून हिंदूंच्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू त्या दुष्टांशी दोन हात करण्यात सिद्ध आहेत.
हे संपूर्ण विश्व आमचे कुटुंब आहे हा वेदांनी केलेला संस्कार चित्तात जतन करून विश्वसंचार करणारे हिंदू ही हिंदूंची खरी ओळख जगाला करून देण्याचे दायित्व आपले आहे.
सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करणे, धर्म रक्षणासाठी अधर्माशी लढणे, अन्यायाला गाडून न्याय प्रस्थापित करणे, दीन-दुबळ्या लोकांना आधार देऊन त्यांना सबल करणे, जगातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणे, विश्वात समतेची भावना निर्माण करून परस्परांमध्ये स्नेह वृद्धिंगत करणे, संघर्ष नव्हे तर सहकार्य हा मानवी समाजाच्या विकासाचा मुलाधार आहे याची जाणीव विश्वाच्या मनात दृढमूल करणे हे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. तरच विश्वगुरू या पदावर आपल्या देशाला विराजमान होता येईल.
हे विश्वगुरूपद आपल्या हिंदुस्थानला प्राप्त व्हावे यासाठी नियतीने आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे. तिचा सुयोग्य उपयोग करून प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध होऊ या.
