जळगाव, : शरद पवारांनी केवळ आपल्या 5 वर्षांचा हिशेब द्यावा. महाराष्ट्राची जनता 50 वर्षांपासून त्यांचे ओझे वाहत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते आज, मंगळवारी जळगाव येथे बोलत होते. यावेळी त्यांनी आयएनडीआयए आघाडी आणि घराणेशाहीवर जोरदार टीका केली.
याप्रसंगी शाह म्हणाले की, शरद पवारांना गेल्या 50 वर्षापासून जनता सहन करीत आहे. पवारांनी आपल्या फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा. महाराष्ट्राची जनता 5 दशके पवारांचे ओझे वाहते आहे. महाविकास आघाडीच्या तीनचाकी रिक्षाचे तिन्ही चाके पंक्चर आहेत. ही पंक्चर असणारी रिक्षा महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही. विरोधकांची इंडिया आघाडी फक्त आपल्या मुलामुलींसाठी आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला तर शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचे आहे. ममता दिदींना भाच्याला तर स्टॅलिनला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. यामध्ये तुमच्यासाठी कुणी आहे का? विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात अराव्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरेंटी असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
