नवी दिल्ली, 6 डिसेंबर (हिं.स.) – नक्षलग्रस्त राज्यांना क्षमतावृद्धीसाठी सुरक्षा संबंधित खर्च (एसआरई) योजनेंतर्गत निधी दिला जातो. या योजनेंतर्गत वर्ष 2018-19 पासून नक्षलग्रस्त राज्यांना 1648.23 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध मोहिमांमुळे नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये वर्ष 2018 च्या आकडेवारीच्या तुलनेत 2022 मध्ये 36 टक्के इतकी लक्षणीय घट झाली आहे. या हिंसाचारात मृत्युमुखी पडणाऱ्या सुरक्षा दल आणि नागरिकांच्या संख्येत 59 टक्के घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीनुसार पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे विषय राज्य सरकारांकडे आहेत. तथापि नक्षलवादाने ग्रस्त राज्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये भारत सरकार साहाय्य करते. नक्षली समस्येचे (एलडब्ल्यूई )समग्रपणे निराकरण करण्यासाठी, वर्ष 2015 मध्ये राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखडा मंजूर करण्यात आला. त्यात सुरक्षा संबंधित उपाय, विकास उपक्रम, स्थानिक समुदायांचे अधिकार आणि हक्क सुनिश्चित करणे इत्यादींचा समावेश असलेल्या बहु-आयामी धोरणाची संकल्पना आहे. सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकार नक्षलवादाने ग्रस्त राज्य सरकारांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या बटालियन, प्रशिक्षण आणि सुरक्षा संबधी खर्च (एसआरई) आणि विशेष पायाभूत सुविधा योजना,यासारख्या योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद, राज्य पोलीस दलांच्या आधुनिकीकरणासाठी निधी, साधने आणि शस्त्रे, गुप्त माहितीचे आदानप्रदान, सुसज्ज पोलीस ठाण्यांचे बांधकाम अशा प्रकारचे साहाय्य करते. विकासाच्या संदर्भात , केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधणे, मोबाईल टॉवर्स बसवणे, बँका, पोस्ट ऑफिसचे जाळे वाढवणे, आरोग्य आणि शिक्षण सुविधा यासह विविध उपाययोजना हाती घेतल्या.
नक्षली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरीक /सुरक्षा दलातील व्यक्ती यांच्या कुटुंबाला सानुग्रह मदत, सुरक्षा दलांचे प्रशिक्षण आणि कार्यान्वयन गरजा, आत्मसर्पण केलेल्या एलडब्ल्यूई कॅडरचे पुनर्वसन, समुदाय स्तरावर पहारा, सुरक्षा दलातील कर्मचारी/नागरिकांना नक्षल्यांनी केलेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी भरपाई, इत्यादी अंतर्गत नक्षलग्रस्त राज्यांना, क्षमतावृद्धीसाठी, सुरक्षा संबंधित खर्च (एसआरई) योजनेंतर्गत निधी दिला जातो.
विकासासंदर्भात, भारत सरकारच्या प्रमुख योजनांसोबतच, नक्षल प्रभावित राज्यांमध्ये रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार, दूरसंचार कनेक्टिव्हिटी सुधारणे, कौशल्य विकास आणि आर्थिक समावेशन यावर विशेष भर देऊन अनेक विशिष्ट उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
हिंदुस्थान समाचार
