चंद्रपूर 18 ऑक्टोबर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली खरी पण त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील किमान ४० हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीपासून वंचित केल्याने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून अनेकवेळा आंदोलन केले. वरोरा येथे मनसेने ठिय्या आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. यानंतरही कर्जमाफी करण्यासंदर्भात शासनाने कुठलेही पाऊल टाकले नाही, दरम्यान तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ ला राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नव्याने सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु त्या संदर्भात कुठलाही आजपर्यंत अध्यादेश काढला गेला नाही. त्यामुळे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील त्यांच्या शिवतीर्थ निवास्थानी १२ आक्टोबर रोजी भेट घेऊन आपली व्यथा मांडली, यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिल्याचे कुकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना २०१७ या नावाने तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविली होती. त्या कर्जमाफी योजनेत जे शेतकरी पात्र होते पण तांत्रिक अडचणीमुळे व सरकारने त्यावेळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने निधीअभावी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. दरम्यान २०१८ पासून सतत कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा त्यांना आजपर्यंत कर्जमाफी मिळाली. एव्हाना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राबविलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून सुद्धा जाणीवपूर्वक या पात्र शेतकऱ्यांना डावलण्यात आले होते. याबाबत राज ठाकरे यांची भेट घेऊन अवगत केले असता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तुम्हचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिल्याचे कुकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
